तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णा भाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.अण्णा भाऊंच्या साहित्यात ग्रामीण,दलित, महिला या समाजातल्या शोषित वर्गांचं अनुभवाधिष्ठित चित्रण आढळतं. ना.सी. फडके आणि वि.स. खांडेकर यांचा प्रभाव असणाऱ्या मराठी कादंबरीच्या त्या काळात जेव्हा शहरी आणि उच्चवर्गीयांचंच प्रतिनिधित्व होत होतं, तेव्हा अण्णा भाऊंनी कनिष्ठ आणि ग्रामीण जनतेचं विश्व साहित्यात आणलं. साहस या गुणाचं चित्रण त्यांच्या अनेक कादंबऱ्यांतून आढळतं. ‘फकिरा’ या त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खऱ्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांगयांची साहसी जीवनकथा मांडलेली आहे, तर ‘वारणेच्या खो-यात' या कादंबरीत स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणारा तरुण आणि त्याच्या प्रेयसीची कथा आहे.'कार्यकर्ते लेखक' असं अण्णा भाऊंनाम्हटलं गेलं, कारण आपल्या साहित्याला त्यांनी सामाजिक चळवळींशी जोडलं. सामान्य कष्टकरी लोकांशी असलेली त्यांची बांधिलकी त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसते. त्यांनी 'वैजयंता'या स्वतःच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत आपली लेखनभूमिका विषद केली आहे, ती अशी-'जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीचजनता कदर करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर नि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्रभूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहीत असतो. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य ह्रदयानं मिळवावे लागते. डोळ्यांनी सर्वच दिसते. परंतु ते सर्व साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा मात्र देते. माझा असा दावा आहे, की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने निनिष्ठेने मी चित्रित करणार आहे नि करीत आहे.'अण्णां भाऊंनी लिहिलेली ‘मुंबईची लावणी’ ही त्या काळात खूप गाजली. मुंबईचं विविधांगी रूप, त्या शहरातली गरिबी आणि श्रीमंती यांच्यातली विसंगती त्यांनी त्यात टिपली आहे. उदाहरणार्थ,मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।परळात राहणारे । रातदिवस राबणारे ।मिळेत ते खाउनी घाम गाळती ।।१।।ग्रॅंट रोड, गोखले रोड । संडास रोड, विन्सेंट रोड ।असे किती रोड इथं नाही गणती ।।गल्ली बोळ किती आत । नाक्यांचा नाहीअंत ।अरबी सागराचा वेढा हिच्या भोवती ।।२।।आगीनगाडी मोटारगाडी । विमान घेतं उंच उडी ।टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती ।।हातगाडी हमालांची | भारी गडबड खटा-यांची ।धडपड इथं वाहतुकीची रीघ लागती ||३||सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथे एका मातंग कुटुंबात अण्णा भाऊंचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव तुकाराम. त्यांचं कुटुंब अशिक्षित आणि हलाखीच्या परिस्थितीतलं होतं. त्यांच्या जातीवर ब्रिटिशांनी गुन्हेगार जात म्हणून शिक्का मारलेला असल्याने त्यांचं बालपणीचं जीवन हे काही प्रमाणात भटक्या अवस्थेत गेलं. अण्णांचे वडील भाऊ साठे हे माळी आणि उत्तम शेतीतज्ञ होते. पण अशा भटक्या जीवनाचा उबग येऊन ते नोकरीसाठी मुंबईला निघून गेले. तिथल्या सुशिक्षित आणि उच्चवर्गीय समाजाचं जीवन बघितल्यानंतर आपल्या मुलांनीही शिक्षण घेऊन असं समृद्ध जीवन जगावं असं त्यांना वाटू लागलं.त्यांच्या सांगण्याप्रमाणे वयाच्या चौदाव्या वर्षी अण्णा भाऊ पहिल्यांदा वाटेगावच्या शाळेची पायरी चढले; पण शिक्षकांच्या निर्दयी मारामुळे दोन दिवसांतच त्यांनी शाळेचा धसका घेऊन शाळेकडे कायमचीच पाठ फिरवली.अण्णा भाऊंच्या बालपणातल्या घडणीमध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा जास्त आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षिनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळाकरणं हे छंद त्यांना जडले. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं एक काम होतं. त्यात नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदातून त्यांच्याभोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असे. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते.क्रांतिसिंह नाना पाटील यांचं एका जत्रेत ऐकलेलं भाषण हे तरुण अण्णा भाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा देऊन गेलं. लवकरच अण्णांचे वडील भाऊ साठे यांनी आपलं सगळं कुटुंब मुंबईला हलवलं. सांगलीहून मुंबईला जाताना या संपूर्ण कुटुंबाला बहुतांश प्रवास पायी करावा लागला. यावरून त्यांच्या त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकते.मुंबईतली सुरुवातीची वर्षं ही अण्णा भाऊंसाठी वैचारिक जडणघडणीची ठरली. तिथे चित्रपटापासून विविध राजकीय पक्षांपर्यंतचं मोठं जग त्यांना जवळून पाहायला मिळालं. गरिबी अनुभवलेल्या अण्णा भाऊंची कम्युनिस्ट विचारप्रणालीशी जवळीक झाली. मुळातच कार्यकर्ता व्यक्तिमत्त्वाचे तरुण अण्णा अंगभूत गुणांमुळे कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे मिसळून गेले. मुंबईत अण्णा भाऊंनी उदरनिर्वाहासाठी बूटपॉलिश, हमाली, वेटर, घरगडी, कुत्र्याला सांभाळणं, मुलांना खेळवणं, खाण कामगार अशी अनेक प्रकारची कामं केली. या सगळ्यातून त्यांचं अनुभवविश्व घडत गेलं. या शहरात त्यांना आणखी एक छंद जडला तो सिनेमापाहण्याचा. सिनेमाची पोस्टर्स आणि दुकानांवरच्या पाट्या वाचत वाचतच त्यांची साक्षरतेकडे वाटचाल झाली. वडील थकल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. गिरणी कामगार म्हणून काही काळ कोहिनूर मिलमध्ये त्यांनी काम केलं. मात्र लवकरच ती नोकरी सुटली आणि हे सगळं कुटुंब पुन्हा आपल्या गावी परतलं.पण उद्योगी वृत्तीचे अण्णा भाऊ गावात रमले नाहीत. बापू साठे या त्यांच्या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते सामील झाले. अण्णा भाऊंना एखाद्या भूमिकेचं आकलन लवकरच आणि चांगलं होत असे. ते ओघवते संवाद उत्तम लिहू शकत. अनेक वाद्यं वाजवण्यात ते तरबेज होते आणि त्यांचं पाठांतरही अतिशय उत्तमहोतं. अण्णांचं हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व तमाशाच्या कलेत खुललं नसतं तरच नवल होतं. त्यांनी तमाशाच्या कलेला लोकनाट्यात रूपांतरित केलं. त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीबद्दल सामान्यांमध्ये जागृती घडवण्याचं मोठं काम पुढे त्यांच्या वगनाट्यांनी केलं. वाटेगावमध्ये असताना वडिलांचं निधन झाल्यानंतर लवकरच अण्णा भाऊंनी कोंडूबाई या अशिक्षित मुलीशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, त्यांच्यासोबतच्या संसारात ते स्थिर झाले नाहीत.'चले जाव' चळवळीतल्या सातारा जिल्ह्यातल्या घडामोडींमध्ये अण्णा भाऊ सहभागी होते. त्यामुळे त्यांच्यावर वॉरंट निघालं आणि त्यांना त्यांचं घर कायमचं सोडावं लागलं. त्यानंतर पुन्हा अण्णांनी भ्रमंती करत मुंबई गाठली. यानंतर तेकम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले आणि पक्षाच्या प्रचारासाठी १९४४ मध्ये त्यांनी लाल बावटा या कलापथकाची स्थापना आपले सहकारी शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत केली. याच काळात अण्णा भाऊंनी स्वतंत्रपणे लेखन करण्यास सुरूवात केली. त्यांचा स्तालिनग्राडचा पोवाडा त्या वेळी कामगारांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. त्यांच्यातला कलाकार बाहेर आणण्यासाठी हे पथक चांगलंच निमित्त ठरलं.पक्षाच्या कामासाठी फिरताना अण्णा भाऊंचा पुण्यातल्या जयवंताबाई या तरुण विवाहित महिलेशी परिचय झाला. काही कारणाने जयवंताबाई आपल्या पतीबरोबर राहत नसत. पुढे अण्णांनी जयवंताबाईंबरोबर आपला दुसरा विवाह केला. या विवाहामुळे त्यांना बरंच स्थैर्य मिळालं आणि कलानिर्मितीसाठी आवश्यक असलेला कौटुंबिक पाठिंबाही मिळाला.शेवटच्या काळात मात्र त्यांच्या जयवंताबाईंबरोबरच्या नात्याला अनपेक्षितरीत्या ओहोटी लागली आणि जयवंताबाई आपल्या कन्येकडे निघून गेल्या. त्यांच्या जाण्याचा अण्णा भाऊंना धक्का बसला आणि त्यांचं मद्यपान प्रमाणाबाहेर वाढून वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांना मृत्यू आला.अण्णा भाऊंचं साहित्य-चौदा लोकनाट्यं, 'वारणेचा वाघ', 'वैजयंता', 'फकिरा', 'चित्रा' इत्यादी प्रचंड गाजलेल्या कादंबर्यांसहित सुमारे बत्तीस कादंबर्या आणि बावीसकथासंग्रह अशी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. त्यांच्या साहित्याचा हिंदी, सिंधी, गुजराती, उडिया, बंगाली, तमिळ,मल्याळी या प्रादेशिक भाषांबरोबरच रशियन, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच, झेक अशा जगातल्या सत्तावीस भाषांमध्येही अनुवाद झाला.त्यांच्या अनेक कादंबर्यांनी त्या काळी मराठी चित्रपटसृष्टीला कथांची रसद पुरवली. 'वैजयंता', 'टिळा लावते मी रक्ताचा', 'डोंगरची मैना', 'वारणेचा वाघ', 'फकिरा', आदी प्रसिद्ध चित्रपट त्यांच्या कथा-कादंबर्यांवर आधारित आहेत.त्यांच्या लोकनाट्यांमध्ये 'अकलेची गोष्ट', 'कलंत्री', 'बेकायदेशीर', 'शेटजीचं इलेक्शन', 'पुढारी मिळाला', 'मूक मिरवणूक', 'देशभक्त घोटाळे', 'लोकमंत्र्यांचा दौरा' इत्यादींचा समावेश आहे.अण्णाभाऊंनी रशियाला जाण्याचा दोनदा अयशस्वी प्रयत्न केला. तिसर्यांदा प्रयत्न केल्यानंतर मात्र त्यांचं रशियाला जाण्याचं नक्की झालं. तेव्हा महाराष्ट्रातूनबरीच आर्थिक मदत त्यांना मिळाली. रशियात अण्णांचं चांगलं स्वागत झालं. त्यावर आधारित 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णनही त्यांनी लिहिलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा